पाणीटंचाईचा आढावा घ्या, टँकरची व्यवस्था करा : गिरीश जोशी
अकोला : अकोला जिल्ह्यात कडाक्याचे ऊन तापत आहे. खारपाणपट्ट्यात काही गावांमध्ये महिलांना लांबून पाणी आणावे लागते. शहरातील विविध भागात तसेच जिल्ह्यामध्ये पाणीटंचाई निर्माण होऊ नये या दृष्टीने प्रशासनाने ताबडतोब बैठक घेऊन त्याचे नियोजन करावे अशी मागणी भाजप नेते गिरीश जोशी यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पालकमंत्री, आमदार, खासदार, महापौर यांच्याकडे मागणी केली आहे. अकोला महानगर तसेच जिल्ह्यात पाणीटंचाईग्रस्त भागाचा आढावा घ्यावा. ज्या गावांमध्ये पाणी टंचाई आहे अशा गावात टँकरचे नियोजन करण्याच्या दृष्टीने बैठक घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. गिरीश जोशी भारतीय जनता पार्टीचे अकोला जिल्हा प्रसिद्ध प्रमुख पदावर गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उष्माघात कक्ष सुरू करणे, मोरणा नदीतील वाढलेली जलकुंभी यासह विविध समाजहिताचे प्रश्न त्यांनी लावून धरले आहेत. निस्वार्थ भावनेने गिरीश जोशी करीत असलेल्या सामाजिक कार्याचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे.