मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

शेतीला जोडधंदा का असावा? जाणून घ्या ५ सर्वोत्तम कृषी पूरक व्यवसाय

Shetila Joddhanda Mahiti Marathi  शेतकरी बंधूंनो, आजच्या काळात केवळ पारंपारिक शेतीवर अवलंबून राहून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. कधी अस्मानी संकट (अतिवृष्टी, दुष्काळ), तर कधी सुलतानी संकट (बाजारात मालाला योग्य भाव न मिळणे) यामुळे शेतीमधील नफा अनिश्चित झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक शेतकऱ्याकडे हक्काच्या उत्पन्नाचा एक दुसरा मार्ग असणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणूनच आज आपण पाहणार आहोत की शेतीला जोडधंदा का असावा? आणि ग्रामीण भागात कोणते व्यवसाय कमी खर्चात सुरू करता येतात. शेतीला जोडधंदा असण्याचे ५ मुख्य फायदे (Benefits of Agri Allied Business) १. नियमित आणि हमखास उत्पन्न पारंपारिक शेतीचे उत्पन्न वर्षातून दोन किंवा तीन वेळाच (पीक आल्यावर) हातात येते. परंतु, जर शेतीसोबत दुग्धव्यवसाय किंवा कुक्कुटपालन सारखा जोडधंदा असेल, तर दररोज किंवा दरमहा हक्काचा पैसा हातात येतो. यामुळे घरखर्च आणि शेतीचा दैनंदिन खर्च चालवणे सोपे होते. २. आर्थिक सुरक्षेची हमी (Risk Management) समजा, एखाद्या वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतातील मुख्य पीक वाया गेले, तर जोडधंद्यातून मिळणारे ...

तेली समाजाच्या मागण्या शासनाने त्वरित मान्य कराव्या - प्रकाश डवले

 



अकोला: "तेली समाज हा केवळ एक समाज नसून या महाराष्ट्राच्या मातीशी, संस्कृतीशी आणि अर्थव्यवस्थेशी जोडलेला एक अत्यंत प्रामाणिक, कष्टाळू आणि स्वाभिमानी घटक आहे. अंधाराचा नाश करण्यासाठी जशी तेलाच्या दिव्याची गरज असते, तशीच समाजाच्या उन्नतीसाठी संत संताजींच्या विचारांची गरज आहे," असे प्रतिपादन राज्य तेली समाज समन्वय समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत मुंबई येथे करण्यात आले. या परिषदेत समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण, संघटन आणि आर्थिक उन्नती या त्रिसूत्रीवर भर देत विविध महत्त्वपूर्ण मागण्या मांडण्यात आल्या.

      या पत्रकार परिषदेला राज्य तेली समाज समन्वय समिती महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रकाश डवले , सरचिटणीस प्रशांत शेवतकर , उपाध्यक्ष एड. किशोर लांजेवार गोंदिया, पुणे जिल्हाध्यक्ष हिरामण सांगे, मुंबई जिल्हाध्यक्ष घनश्याम बोराखडे आणि नागपूर जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत डवले , ॲड संजय शेलोकार नागपूर यांच्यासह अनेक मान्यवर व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


     संत संताजी जगनाडे महाराजांचा वारसा -


पत्रकार परिषदेत बोलताना वक्त्यांनी तेली समाजाच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा दिला. छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत मावळे आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे विचार आपल्या लेखणीतून जिवंत ठेवणारे 'परमवीर' संत संताजी जगनाडे महाराज हे तेली समाजाचे सर्वात मोठे दैवत आणि आदर्श आहेत, असे सांगत त्यांनी दिलेली प्रामाणिकपणाची व भक्तीची शिकवण आजच्या काळातही तितकीच प्रेरणादायी असल्याचे स्पष्ट केले. विदर्भ, मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात तेली समाज मोठ्या संख्येने असून राज्याच्या राजकारणात आणि जडणघडणीत नेहमीच निर्णायक राहिला आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.


     तेली समाजाच्या प्रमुख मागण्या 


आधुनिकतेच्या युगात पारंपरिक व्यवसाय संकटात सापडल्याने आणि तरुण पिढी शिक्षणासाठी संघर्ष करत असल्याने, शासनाने खालील मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे


    शहरांमध्ये वसतीगृहांची सोय


ग्रामीण भागातील मुला-मुलींना उच्च शिक्षणासाठी मुंबई, नागपूर आणि पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये हक्काची आणि परवडणाऱ्या दरातील वसतीगृहे उपलब्ध करून देण्यात यावीत.


     महामंडळाला भरीव निधी


शासनाने जाहीर केलेले 'संत संताजी जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळ' निर्माण केले, त्याला भरीव निधी देऊन तातडीने कार्यान्वित करावे.


     योग्य प्रतिनिधित्व


तेली समाजाच्या लोकसंख्येचा विचार करता, शासन आणि प्रशासनाच्या विविध मंडळांवर समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे.


     पारंपरिक उद्योगाला आधुनिकतेची जोड


 पारंपरिक तेल घाणी उद्योगाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी शासनाने विशेष अनुदान योजना सुरू करावी.


"आम्ही आजपर्यंत प्रामाणिकपणे कष्ट केले आहेत. पण आता शिक्षण, संघटन आणि आर्थिक प्रगती या सूत्रांचा वापर करून हक्कासाठी एकजुटीने शासनास विनंती करून मागण्या मान्य करण्यासाठीचा प्रयत्न आहे."

- प्रकाश डवले अध्यक्ष राज्य तेली समाज समन्वय समिती महाराष्ट्र


      पत्रकार परिषदेचा समारोप 'जय संताजी, जय महाराष्ट्र' या घोषणेने अत्यंत उत्साहात झाला. समाजाच्या या सकारात्मक आणि न्याय्य मागण्यांना शासनाकडून त्वरित प्रतिसाद मिळेल, अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली.

टिप्पण्या