अकोला : देशातील सध्याचा काळ हा अमृतवर्षाचा आहे. २०४७ साली आपण स्वातंत्र्याची शताद्बी साजरी करणार आहोत. तोपर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी सामाजिक समरसता,पर्यावरण, स्वबोध, स्वदेशी आणि कुटुंब प्रबोधन या पंचसूत्रीची कास धरा, समाजातील सज्जनशक्तीचे जागरण करा, असे आवाहन रा.स्व.संघाचे संपर्क प्रमुख शैलेष पोतदार यांनी केले. ते येथील एसीसी मैदानावर आयोजित संघ शिक्षा वर्गाच्या जाहीर समारोप प्रसंगी बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी ब्रिजमोहन चितलांगे, सर्वाधिकारी उल्हास बपोरीकर, प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, महानगर संघचालक गोपाल खंडेलवाल उपस्थित होते.
ते पुढे बोलताना म्हणाले की, कथित विकसित पश्चिमी देशांनी निसर्गाचे शोषण करून पर्यावरणाचा भीषण प्रश्न निर्माण केला आहे.आमची भारतीय हिंदू संस्कृती मात्र निसर्गाचे शोषण नव्हे तर दोहन करावे असे शिकविते.
त्याकाळी मोगलांनी अनेक मंदिरे तोडली पण अहल्यादेवी होळकर या महापराक्रमी व साध्वी स्त्रीने स्वखर्चातून १०० पेक्षा अधिक मंदिरे बांधून त्यांचा जीर्णोद्धार केला आहे.या प्रसंगी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर ,महाराणा प्रताप, शीख गुरू अर्जूनदेव यांच्या महानतेवरही प्रकाश टाकला.
ते म्हणाले अतिरेक्यांना पाठिंबा देणार्या पाकला भारतीय लष्कराने चांगलाच धडा शिकविला आहे. पण भारतातील काही घटक यावर संशय निर्माण करीत आहेत अशा घटकांना देशातील लोकांनी ओळखावे असेही ते म्हणाले. यावेळी प्रमुख अतिथी ब्रिजमोहन चिंतलांगे यांचे उद्बोधन झाले. शिक्षार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिक सादर केली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या