वैशिष्ट्यीकृत

बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या शिष्टमंडळाची राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

 



अमरावती : बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटना महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष मनोज चव्हाण गेल्या आठ दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी विविध प्रकल्पांना भेटी दिल्या. तेथील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या व महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्तांना संघटित करून त्यांच्या न्याय हक्काचा लढा अधिक तिव्र करण्यासंदर्भात दौरा असल्याचे सांगितले.या दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांची कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन प्रकल्पग्रस्त व शेतकरी प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.

यावेळी संघटनेच्या स्थापनेपासून आजपर्यंत राबविण्यात आलेल्या विविध आंदोलनांची, प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी केलेल्या पाठपुराव्याची तसेच शेतकरी हिताच्या विविध प्रश्नांवर संघटनेने केलेल्या कार्याची माहिती दिली.संघटनेच्या वतीने प्रलंबित प्रश्नांबाबतचे निवेदनही राजू शेट्टी यांना सादर करण्यात आले.




 राजू शेट्टी यांनी बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या कार्याचे कौतुक करत प्रकल्पग्रस्त व शेतकरी बांधवांच्या न्याय हक्कांसाठी सुरू असलेल्या संघर्षास शुभेच्छा दिल्या.तसेच संघटनेची चळवळ राज्यभर अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व सूचना केल्यात.येत्या जुलै महिन्यात बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या वतीने विदर्भात प्रकल्पग्रस्त परिषद होणार असून या परिषदेला राजु शेट्टी यांना संघटनेच्या वतीने निमंत्रित करण्यात आले आहे. शेट्टी यांनी आवर्जून उपस्थित राहणार असल्याचे आश्वासन मनोज चव्हाण यांना दिले आहे. महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्तांना संघटनेच्या माध्यमातून अधिक बळ मिळाले असुन त्यांना नवीन दिशा मिळाली असल्याचे राजु शेट्टी यांनी आवर्जून सांगितले परंतु तमाम महाराष्ट्रातील शेतकरी संघटीत होत नसल्याची चिंता सुध्दा यावेळी त्यांनी व्यक्त केली असल्याचे मनोज चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

टिप्पण्या