वैशिष्ट्यीकृत

अखेर बोर्डीनाला प्रकल्पग्रस्तांची प्रतिक्षा फळाला, 28 कोटी रुपये सानुग्रह अनुदानाचे वाटप सुरु

                 

   


          - विशाल पुरंदरे -

चांदुर बाजार -- तालुक्यातील बोर्डी नाला प्रकल्पातील 2006 ते 2013 या कालावधीत सरळ खरेदी पद्धतीने मोठ्या प्रमाणावर अत्यंत कमी दराने जमीनी खरेदी करण्यात आल्या होत्या. दरम्यान या शेतकऱ्यांना न्यायालयात जाण्याचा संवैधानिक अधिकार सुध्दा तत्कालीन सरकारने शिल्लक ठेवला नव्हता.त्यामुळे न्यायाची अपेक्षा सर्व शेतकऱ्यांनी सोडली होती.मात्र मनोज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेने बारा वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षा नंतर अखेर शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला.


राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रति हेक्टरी पाच लाख रुपये विशेष सानुग्रह अनुदानाला नियामक मंडळाच्या माध्यमातून मंजुरी देऊन विदर्भातील सरळ खरेदी धारक शेतकऱ्यांना एकुण आठशे बत्तीस कोटी रुपये सानुग्रह अनुदान मंजूर करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळवून दिला.




गेल्याच वर्षी 16 एप्रिल 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनादेश वितरणाचा शुभारंभ अमरावती मधुन केला होता. तेव्हापासुन राज्याच्या आर्थिक स्थितीनुसार सरळ खरेदी धारक शेतकऱ्यांना हळूहळू धनादेश वितरित करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने चांदुरबाजार तालुक्यातील बोर्डी नाला प्रकल्पातील 532 खातेधारकांना एकुण 27.78 कोटी रुपये विशेष सानुग्रह अनुदानाचे वाटप अचलपूरचे आमदार प्रविण तायडे, जिल्हापरिषदेच्या माजी अध्यक्षा श्रीमती सुरेखाताई ठाकरे, बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोजभाऊ चव्हाण यांचे शुभहस्ते करण्यात आले.


 मंगलामाता संस्थान येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात प्रकल्पग्रस्तांना लवकरात लवकर निधी वाटप करण्याचे निर्देश आमदार प्रविण तायडे यांनी दिले.प्रकल्पग्रस्तांच्या न्यायाची हि सुरवात असुन आणखी खुप काही सरकारकडे आपलं शिल्लक आहे त्यासाठी प्रकल्पग्रस्तांना संघटीत राहण्याचा सल्ला मनोज चव्हाण यांनी दिला. तर सूरेखाताईनी आपल्या भाषणातुन प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला.




यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष प्रा.निलेश ठाकरे,बी.जे.पी चे.नंदुभाऊ बर्वे, राजेश शेगोकार, संजय गिद, दिलिप कदम, सुमित घोम, रमेश तायवाडे, राजाभाऊ काळे संजय धोंडे, रविंद्र बोंडे, मारोतराव भुजबळ, राहूल वैराळे, मधुकर नवले, विकास भुजबळ, वसंतराव खंडझोड दत्तात्रय गाडगे, उमेश बोदुळे,जलसंपदाचे कार्यकारी अभियंता विरेंद्र चौधरी,उपविभागीय अभियंता श्री.मावळे,श्री डवरे यांचेसह तळेगाव मोहना,कोंडवर्धा,ईनायतपूर, शिरसगाव, बोरगाव मोहना तुळजापूर गढीसह इतरही गावातील प्रकल्पग्रस्त महिला पूरुष शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बळीराजा संघटनेच्या जयघोषाने परीसरात उल्हासाचे वातावरण निर्माण झाले आहे. होते.कार्यक्रमाचे संचालन रविंद्र ढेवले यांनी केले तर आभार प्रदर्शन जलसंपदाचे डवरे यांनी केले.शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पण्या