सकाळी 10 वाजेपर्यंत शाळा सुरू ठेवा आ. सावरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
अकोला - जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची गंभीर दखल घेत आमदार रणधीर सावरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. शैक्षणिक संस्थांच्या वेळांमध्ये तातडीने बदल करण्याची त्यांनी सूचना केली होती. उष्माघात (सन स्ट्रोक) व इतर उष्णतेशी संबंधित आजारांचा वाढता धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे अत्यंत आवश्यक असल्याचे आमदार सावरकर यांनी सांगितल्यावर त्यांनी दखल घेतली.
अकोला जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक तापमान नोंदविणाऱ्या जिल्ह्यांपैकी एक असून सध्या उन्हाचा तीव्र तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. अशा परिस्थितीत दुपारच्या वेळेत शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाताना प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता अधिक वाढली आहे.
याच पार्श्वभूमीवर सकाळी १० नंतर उष्णतेची तीव्रता अधिक वाढत असल्याने जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या (शासकीय, अनुदानित व खासगी) शाळा व महाविद्यालयांच्या वेळांमध्ये तात्पुरता बदल करून
सकाळी सुरू करून जास्तीत जास्त सकाळी १० वाजेपर्यंत शाळा सुरू असावी, अशा सूचना आमदार रणधीर सावरकर यांनी केल्या. विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत आवश्यक असून प्रशासनाने याबाबत तात्काळ सकारात्मक निर्णय घेतला, त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाचे स्वागत केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा