अकोला : मोर्णा नदीमध्ये जलकुंभी पसरल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे, या प्रश्नावरून भाजपाचे प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी आक्रमक झाले आहेत. महानगरपालिका आयुक्तांनी येत्या चार दिवसात मोर्णा नदीवरील जलकुंभी न काढल्यास त्यांच्या निवासस्थानी नदीकाठीचे नागरिक झोपण्यासाठी अभिनव पद्धतीने आंदोलन करतील असा इशारा माजी नगरसेवक गिरीश जोशी यांनी दिला.
अकोला महानगरपालिकेने जलकुंभी कार्ड सुरू केले आहे अशा प्रकारचा प्रचार केला, परंतु प्रत्यक्षात जलकुंभी काढण्यात आली नाही. त्यामुळे नदी काठावरील प्रभाग 10 मधील नागरिक डासांच्या त्रासापासून त्रस्त आहेत. रात्री त्यांना झोपण्यामध्ये अनेक अडचणी येत असून रोगराई पसरत आहे. या संदर्भात मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांनी कारवाई न केल्यास त्यांच्या निवासस्थानी जलकुंभी त्रस्त नागरिक झोपण्यासाठी जन आंदोलन करतील. येत्या चार दिवसात यासंदर्भात कारवाई न केल्यास आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. वारंवार भाजपा लोकप्रतिनिधींनी सूचना दिल्यावर सुद्धा केवळ वृत्तपत्रात प्रचार प्रसार करून जलकुंभी काढण्याचे नाटक करण्यात येत असल्याचे भाजपाचे प्रसिद्ध प्रमुख गिरीश जोशी यांनी सांगितले.