मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

अखेर बोर्डीनाला प्रकल्पग्रस्तांची प्रतिक्षा फळाला, 28 कोटी रुपये सानुग्रह अनुदानाचे वाटप सुरु

                                - विशाल पुरंदरे - चांदुर बाजार -- तालुक्यातील बोर्डी नाला प्रकल्पातील 2006 ते 2013 या कालावधीत सरळ खरेदी पद्धतीने मोठ्या प्रमाणावर अत्यंत कमी दराने जमीनी खरेदी करण्यात आल्या होत्या. दरम्यान या शेतकऱ्यांना न्यायालयात जाण्याचा संवैधानिक अधिकार सुध्दा तत्कालीन सरकारने शिल्लक ठेवला नव्हता.त्यामुळे न्यायाची अपेक्षा सर्व शेतकऱ्यांनी सोडली होती.मात्र मनोज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेने बारा वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षा नंतर अखेर शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रति हेक्टरी पाच लाख रुपये विशेष सानुग्रह अनुदानाला नियामक मंडळाच्या माध्यमातून मंजुरी देऊन विदर्भातील सरळ खरेदी धारक शेतकऱ्यांना एकुण आठशे बत्तीस कोटी रुपये सानुग्रह अनुदान मंजूर करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळवून दिला. गेल्याच वर्षी 16 एप्रिल 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनादेश वितरणाचा शुभारंभ अमरावती मधुन केला होता. तेव्हापासुन राज...

मी पाहिलेले संजय खडसे

 



संजय खडसे या नावाला परिचयाची गरज नाही. 'नाम ही काफी है' हे वाक्य खडसे सरांच्या बाबतीत लागू पडते. उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी अशा विविध पदांवर आपण त्यांना पाहिले. मात्र मी संजय खडसे यांच्यातला माणूस पहिला.


अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी असताना तासनतास कामात व्यस्त. टेबलवर फाईल्स चा ढिगारा पडलेला. तरी कामाचा कधी कंटाळा नाही. कितीही काम असेल मात्र समोर बसलेला शेतकरी आपल्या भेटीसाठी 60 किलोमीटर वरून आला आहे , याची जाण असणारा अधिकारी. 


माझी आणि खडसे साहेबांची पहिल्यांदा भेट कधी झाली हे नीट आठवत नाही. पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करीत असताना शेकडो अधिकारी संपर्कात आले. मात्र खडसे साहेबासारखा उमद्या मनाचा अधिकारी विरळाच. भेटीसाठी येणारे लोकप्रतिनिधी असो व्यापारी, उद्योगपती किंवा सामान्य शेतकरी सर्वांना सारखीच वागणूक. समोर बसलेला माणूस काहीतरी तक्रार किंवा मागणी घेऊन आलेला आहे. त्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्यावे एवढीच अपेक्षा असते.


 अनेक कार्यालयांचे उंबरठे झिजवून झाल्यानंतर सुद्धा तक्रारीचे निवारण झाले नाही की अनेकजण खडसे साहेबांच्या भेटीला येत. तक्रारीचे निवारण झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटत. दिवसभर सरकारी कामाचा डोलारा सांभाळून सुध्दा सामाजिक कार्याची आवड त्यांनी जोपासली आहे. 


प्रदूषण कमी करण्यासाठी पेट्रोलची गाडी न वापरता सायकल वापरा हा संदेश द्यायचा होता. त्यासाठी केवळ बोलून होणार नाही. म्हणून त्यांनी दर रविवारी सायकल चालविणे सुरू केले. पाहता पाहता अकोल्यात सायकल चालविणाऱ्या युवकांचा मोठा ग्रुप तयार झाला. 


बाळापूर येथे उपविभागीय अधिकारी असताना त्यांचे समाजाभिमुख कार्य लक्षात घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून पुरस्कृत केले.


 याव्यतिरिक्त कितीतरी संस्था, संघटनांनी त्यांचा सत्कार केला याची मोजदाद होणार नाही. एखादा प्रसिद्ध नेता, अभिनेत्यापेक्षा त्यांची लोकप्रियता कमी नाही. अशा समाजाभिमुख कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना ईश्वराने अधिक बळ द्यावे.

टिप्पण्या