वैशिष्ट्यीकृत

जनगणना कर्मचारी दुहेरी संकटात आमदार साजिद खान पठाण आक्रमक

 



अकोला : सध्या अकोला शहरात जनगणना करण्याचे काम सुरू आहे. जनगणना करण्यासाठी शासकीय कर्मचारी व शिक्षक नियुक्त करण्यात आले आहे. काही कर्मचाऱ्यांना 70 ते 100 घरांची जनगणना करण्याचे काम दिले तर काही कर्मचाऱ्यांना 200 ते 300 घरांची जनगणना करावी लागत आहे. मनपा प्रशासनाच्या बेताल नियोजनावर आमदार साजिद खान पठाण यांनी संताप व्यक्त केला आहे.




     एक तर शासकीय कर्मचाऱ्यांना जनगणना करण्यासाठी त्यांच्या नियमित कामातून कोणतीही सूट देण्यात आलेली नाही. त्यांना दैनंदिन शासकीय कामकाज पूर्ण करून सकाळ संध्याकाळ जनगणना करावी लागत आहे. सध्या ऊन 45-46 डिग्री सेल्सिअस वर असताना आणि अकोला जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला असताना भर उन्हात काम करण्याची वेळ आली आहे. त्यातच काही कर्मचाऱ्यांवर तिप्पट ते चौपट कामाचा ताण आल्याने जीव जाण्याची वेळ आली आहे. जनगणना करणाऱ्या एका शिक्षकाचा नुकताच मृत्यू झाला. यानंतरही मनपा प्रशासनाची संवेदनशीलता दिसून येत नाही. अशाप्रकारे अतिरिक्त ताण येऊन एखाद्या कर्मचाऱ्यांचा जीव गेल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न साजिद खान पठाण यांनी उपस्थित केला आहे. 


घराप्रमाणे मानधन द्यावे


ज्या कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात 70-80 घरांची गणना करायची त्यांना 9 हजार मानधन तसेच ज्या कर्मचाऱ्यांना 250 ते 300 घरांची गणना करायची त्यांना सुद्धा तेवढेच मानधन हा कुठला न्याय? असा सवाल आमदार पठाण यांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध विधान भवनात आवाज उठवणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. प्रत्येक घराच्या नुसार मानधन देण्यात यावे, ज्यांना कामाचा ताण जास्त त्यांना मानधन जास्त असे धोरण अवलंबिले पाहिजे.


प्रगणकांमध्ये असंतोष


ज्या प्रगणकांवर कामाचा ताण जास्त आला अशा कर्मचाऱ्यांमध्ये अत्यंत नाराजीचे वातावरण आहे. आपल्याला सुद्धा इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे 80 ते 100 घरांची गणना करण्याचे काम द्यावे अशी मागणी होत आहे. महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला असता टाळाटाळ करण्यात येत असल्याचे दिसून येते.

टिप्पण्या